माझी वसुंधरा अभियान अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असावीत- सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर : आपल्या मध्ये चांगले काम करण्याची क्षमता असून चांगला लोकसहभाग मिळवून माझी वसुंधरा अभियान 40 अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असतील याची दक्षता घ्यायला हवी अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी माझी वसुंधरा अभियान या कार्यशाळेत दिल्या.

माझी वसुधंरा अभियान 40 अंतर्गत आज (शुक्रवारी) कोल्हापूर जिल्हयातील 1025 ग्रामपंचायतींपैकी केंद्रित केलेल्या ग्रामपंचायतीकडील संबंधित सहा गट विकास अधिकारी तसेच तालुका नोडल अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी व तालुका व्यवस्थापक (BM) ASSK, यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक समिती सभागृह घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले एखादे काम करत असताना नकारात्मक प्रसिध्दीला सामारे जावे लागणार नाही याची काळजी घ्या. सदर अभियानामध्ये मनापासून सहभागी व्हा व या अभियानामध्ये चांगले काम करण्याची संधी असून उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व ओळखून त्याचे विकृतीकरण रोखून संवर्धन करण्यावर भर देण्यात यावा.यावेळी माझी वसुंधरा अभियान 30 मध्ये राज्य स्तरावर व्दितीय क्रमांक मिळविण्या- या ग्रामपंचायत धरणगुत्ती ता. शिरोळ व पूणे विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्या-या ग्रामपंचायत वाटंगी ता. आजरा कडील ग्रामसेवक , ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), तालुका व्यवस्थापक (BM) (ASSK) व सहा. गट विकास अधिकारी यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

माझी वसुंधराअभियान 40 अंतर्गत विभागीय तांत्रिक तज्ञ, विभागीय आयुक्त कार्यालय पुण्याच्या गौरी पाटील यांनी पंचमहाभूते भूमी, अग्नी, जल, वायू व आकाश या 5 पंचत्वांशी निगडीत शासन निर्णयानूसार अभिप्रेत असणा-या बाबींचे सखोल सादरीकरण करुन छोटया छोटया बाबींमधून जास्तीत जास्त गुणांकन कश्या पध्दतीने मिळवता येतील या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच माझी वसुंधरा 30 व माझी वसुंधरा 4.0 यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याची सविस्तर माहिती देवून उपस्थितांच्या सर्व शंकाचे निरसन केले.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी माझी वसुंधरा अभियान 4.0 राबवित असताना प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या गावांना बक्षिस मिळविण्याच्या दृष्टीने व गावांचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आपले 100 टक्के योगदान देण्याबाबत आवाहन केले.सदर कार्यशाळेसाठी प्र. सहा.गट विकास अधिकारी ए एस कठारे, जिल्हा तांत्रिक नोडल अधिकारी नितीन मोहिते माझी वसुंधरा अभियान, एस. एस. चौगले, ग्राम विकास अधिकारी तसेच केंद्रित केलेल्या ग्रामपंचायतींकडील सर्व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे सुत्र संचालन व आभार ग्राम विकास अधिकारी सचिन शिरदवाडे यांनी केले.