
कोल्हापूर : सीमाभागात महाराष्ट्रातील काही वाहनांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर एसटी महामंडळाने कोल्हापूर-निपाणीमार्गे कर्नाटकात जाणार्या दररोजच्या 660 फेर्या रद्द केल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार ही कार्यवाही केली. बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी एसटी महामंडळाला कर्नाटकात जाणार्या एसटी बसेस थांबविण्याची सूचना केली. त्यानुसार एसटी महामंडळाने कोल्हापूर-निपाणी मार्गे जाणार्या एसटीच्या सुमारे 660 बस फेर्या थांबविल्या आहेत.कोल्हापूर विभागातून कर्नाटकात दररोज 20 ते 25 हजार प्रवासी प्रवास करतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, बांदा या तालुक्यांमध्ये जाणार्या एसटी कापशी-उत्तूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत; तर सांगलीमधून कर्नाटकमध्ये जाणार्या सुमारे 60 बस फेर्या बंद करण्यात आल्या. दरम्यान, कर्नाटकनेही महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा स्थगित केली आहे.
