
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वत्र टीकेचे धनी बनलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आता पदमुक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत.
राज्यपालांनी स्वतःच आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. एबीपी माझाने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे खरच राज्यपाल पदमुक्त होतात का ? हे आता पाहावं लागेल.शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं विधान भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यातील विरोधीपक्ष आक्रमक झाला होता. राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा इशारा दिला होता. शिंदे गट आणि मनसेनेही राज्यपालांवर टीका केली होती. याशिवाय सध्या भाजपमध्ये असलेले दोन्ही राजे उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या एकूण सर्व प्रकरणामुळे कुठेतरी भाजपला बॅकफूटवर गेलायचं पाहायला मिळत आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सातत्याने वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होत. तेव्हाही विरोधी पक्ष आक्रमक झाला होता.दरम्यान, राज्यपालांनी पदमुक्त होण्याचे संकेत देताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र! असं ट्विट त्यांनी केलं आहे.
