
परभणी : आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही फसवी घोषणा आहे. गेल्या 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषिमंत्री सध्या धुंदीत आहेत. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केलाय.
यंदा राज्यभरातच प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळेच परभणीत आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सभागी झाले होते. या मोर्चानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.”मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू अशी घोषणा केली. मात्र मागच्या 110 दिवसात राज्यभरामध्ये जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फसवी आहे.
सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री सध्या वेगळ्याच धुंदीत आहेत. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले जात आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज होती. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.
