म्हणूनच महाराष्ट्रात थंडी वाढली…

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे,कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे.

सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला आहे.

 सध्या उत्तरेकडून थंड आणि  कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळं राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली आले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ ते २० अंशाच्या आसपास आहे. तर कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे म्हणाले की, हवा ज्यावेळी कोरडी असते त्यावेळी तापमानात चढ किंवा उतार होते. सध्या हवा कोरडी आहे, त्यामुळं थंडी वाढत आहे. दुसरे म्हणजे वाऱ्याची दिशा. वारे कोणत्या बाजूने वाहते यावर देखील तापमानाचं अवलंबून असते. जमिनीवरुन जर वारे येत असेल तर ते वारे कोरडे येते. तर थंडीच्या दिवसात उत्तरेकडे बर्फ पडतो, त्यामुळं तिकडून कोरडे वारे वाहते, यामुळं मध्य भारतात थंडीचा कडाका वाढत असल्याची माहिती मयुरेश प्रुभणे यांनी दिली आहे. 

सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला तसेच दुसरीकडे चक्रीवादळ देखील आलं. आता वारे उत्तर भारतातून वाहत आहे, त्यामुळं थंडी वाढत आहे. सध्या नैर्ऋत्य मान्सूनने देशात निरोप घेतला आहे. तर दुसरीकडं २९ ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सून सुरु होत आहे. हा पाऊस आंध्र प्रदेशपासून पुढे तामिळनाडूपर्यंत असतो. हे वारे ईशान्येकडून येते त्यामुळं दक्षिण भारतात पाऊस पडतो. हा पाऊस साधारण: डिसेंबर महिन्यापर्यंत असल्याची माहिती प्रभुणे यांनी दिली. त्यामुळं थंडीची लाट उत्तर कर्नाटकपर्यंत जातात. दक्षिण भारतात थंडीचा जोर वाढत नसल्याचे प्रभुणे म्हणाले. या थंडीचा जोर मध्ये भारतात असतो. त्यामुळं महाराष्ट्रातही थंडी वाढते.