भाजपने ‘हे’ पाप केलं-जयंत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती. हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना केली.

काही झालं तरी प्रोफेशनली आपल्याला टिकायचे तर समोरचा पक्ष फोडला पाहिजे हा उद्देश ठेवून भाजपने शिवसेना फोडली तसे कारस्थान रचण्यात आले. आता नावही आणि चिन्हही काढून घेण्यात आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आणि ती कुणाच्या घरात गेली हे थोड्या दिवसात समोर येईल म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची व्यवस्था आयोगाच्या माध्यमातून होईल यात शंका नाही असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

शिवसेनेने ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड भेद वापरायचा व त्याला पळवायचे है योग्य आहे का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी यावेळी केला. जो उमेदवार शिवसेनेने ठरवला आहे त्याचा प्रचार शिवसेनेने केला आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के शिवसेना निवडून येईल अशी परिस्थिती आहे.

शिवसेनेचा जो फुटीर गट आहे त्याचा पदोपदी महाराष्ट्रात निषेध व्हायला लागला आहे म्हणून मग कुणावर बोलायचं तर राष्ट्रवादीवर हा त्यांचा उद्देश आहे. राष्ट्रवादीने शिवसेना, कॉग्रेस यांच्यासोबत पुढाकार घेऊन साथ दिली आणि पवारसाहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

🤙 9921334545