मुंबई वृत्तसंस्था : आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. परभणी येथील जाहीर सभेत त्यांनी हा मोठा राजकीय दावा केला आहे. सत्तारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही ४० आमदार अधिक दहा, त्यात पाच आमदार आणखी येणार आहेत. पहिले दहा खासदार होते नंतर १२ खासदार झाले आता १३ झाले. दोन-तीन आणखी येणार आहेत. तरी हे लोक असली-नकली असं सांगताय, मग हे येणारे काय वेडे आहेत का? आता गल्ली-बोळात फिरत आहेत, अगोदरच फिरले असते तरी ही वेळ आली असती का?
याशिवाय हे कशामुळे झालं, घरात बसल्यामुळे झालं. आज तुमची मैदानात उतरण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवण्याचे स्वप्न पाहत आहात, मग अडीच वर्षे काय केलं? मुख्यमंत्री हे छोट पद नाही, तो किती मोठी किती शक्तीशाली असतो याचा अंदाज मी लावू शकतो. ज्यावेळी होता त्यावेळी काही दिलं नाही, आता नाहीत तर काय देणार? तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही असंही सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता बोलून दाखवलं.