रत्नागिरी, गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वाहतूक बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळा व रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर तसेच गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.

या मार्गावरून पन्हाळा, बांबवडे व खाली कोकणाकडे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. पोलिसांनी वाघबीळ व केरले गावाजवळून वाहतूक आडवली आहे. मात्र वाघबीळ येथून महामार्गावरून वाहतुक तर जोतिबा येथून ही वाहतूक वळवली आहे. रेडेडोह येथे पाणी पातळी वाढत आहे. त्यातच राधानगरी धरणाचे दोन दरवाजे रात्री उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाणी पातळीत आणखीन वाढणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली असून पर्याही मार्गाने अनेक ठिकाणी वाहतूक सुरू आहे. असळजजवळ रस्त्यावर पाणी आले आहे. या मार्गावरून गगनबावडा, साळवण व करूळ घाटातून कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे