हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

हुपरी: राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथे नगर परिषदेत प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई आणि नगराध्यक्ष सौ. जयश्री गाट यांना देण्यात आले.

या प्रसंगी नगरसेवक सौ. अनिता मधाळे, माजी नगरसेवक प्रकाश बावचे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री महादेव आढावकर, प्रसाद म्हेतर, ऋषिकेश म्हेतर, सचिन माळी, उदय माने, बालाजी शिंदे, धर्मप्रेमी सर्वश्री प्रसाद देसाई, गणेश घोरपडे, संदीप निकम, हर्षल पोतदार, समस्त हिंदुत्ववादी संघटनचे रवींद्र गायकवाड, लोककल्याण ग्राहक कल्याण संरक्षण संस्थेचे हुपरी शहराध्यक्ष नितीन काकडे, हिंदु जनजागृती समितीचे संतोष सणगर उपस्थित होते.

प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा ! – हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन
यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. तरी जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क यांची विक्री करतात,तसेच ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात देण्यात आले.