मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे.

या वक्तव्यातून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्या म्हणत विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यातून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी आता विरोधक करत आहेत. अनेक विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विटवर राज्यपालांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल.. असे एक ट्विट राऊतांनी केले आहे.थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे… 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील ट्विट करत राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, अशी मागणी त्यांनी केले.
