मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावं लागल्यास काय पर्याय?,असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारल्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या सर्वांच स्वागत करेन, असं वक्तव्य केल्याने आता नवीन चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न चर्चेत आहे. आता हा वाद कोर्टात पोहोचला आहे. यावर अनेक चर्चा होत असतात. त्यात काहीजण म्हणतात की, शिंदेंसमोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही तर काही म्हणत आहेत की शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना. यावर आता रिपाईचे नेते रामदास आठवलेंच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील नवीन सरकारकडे त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळात रिपाईचं एक मंत्रीपद हवं, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडे केलीये. तसेच मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी काही तांत्रिक अडचणी असल्या तरी अधिवेशन झालं पाहिजे. तसेच या आठवड्यात महाराष्ट्रात मंत्रीमंडळ स्थापन होईल, आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होईल, असं भाकितही आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
