राज्यपाल, हे काय सुरू आहे ? : संजय राऊत यांचा सवाल

मुंबई : भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असणं बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडले आहे. राज्यपाल हे काय सुरु आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीला दोन आठवडे उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी भारतीय घटनेचा हवाला देत मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय वैध नसल्याचे म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही.
राज्यपाल, हे काय सुरू आहे ?,असे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.