कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. तत्कालीन काळात त्यांनी समतेसाठी लढा दिला. त्यांच्या एकूणच सामाजिक, सर्वांगीण विचारांचा युवकांनी अंगिकार करावा, असे प्रतिपादन ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी केले.
निमित्त होते शाहू महाराजांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात डॉ. थोरात यांचे, ‘राजर्षी शाहू छत्रपती-जीवन कार्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार होते. यावेळी व्यासपीठावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. भारती पाटील आदी उपस्थित होते.
खऱ्या अर्थाने जनतेच्या सुख-दु:खात सामिल होणारे राजे म्हणून, शाहू महाराजांचा उल्लेख करावा लागेल. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले होते, असे सांगून महाराजांच्या तत्कालीन समाज विषयक धोरणाचा समाजावर काय प्रभाव पडला आहे ? यावर संशोधकांनी, अभ्यासकांनी जरुर प्रकाश टाकावा, असे आवाहन डॉ. थोरात यांनी उपस्थितांना केले. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाल्याचे सांगून आजही शाहू महाराजांचे विचार हे मनुष्यत्वाला, माणुसकीला पोषक असल्याचा उल्लेख करुन महाराजांच्या एकूणच सामाजिक विचारांचा प्रसार आणि प्रचार सध्याच्या तरुणांनी करावा, असे ते म्हणाले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे, मानवतावादाचे, समाज विषयक विचार थांबता कामा नये. ते विचार प्रत्यक्ष कृतीत यावेत. केंद्र व राज्य सरकारने शाहू विचारांवर कार्यरत रहावे. तीच महाराजांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी, सत्तेचा राजदंड खऱ्या अर्थाने बहुजनांच्या उत्थानासाठी वापरला. हा राजदंड वापरणारे ते एकमेवाव्दितीय राजे होते. महाराजांच्या अंगी साधुत्व होते. तत्कालीन सामाजिक नकाशा बदलण्याचे काम शाहू महाराजांनी केले, असे सांगून शाहू विचारांवर आपण स्वत: नखशिखांत पोसलो गेलो असल्याचे गौरवोग्दार काढले. बहुजन समाजाचे ‘आत्मभान’ शाहु महाराजांनी जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे ‘लोकमान्य’ असल्याचे उद्गार महाराजांनी काढल्याची आठवण सांगून ‘काय घडले’ आणि ‘का घडले’ हे सांगणारे इतिहासकारांचे दोन प्रकार असल्याचे सांगून डॉ. थोरात हे का घडले ? हे सांगणारे इतिहासकार असल्याची टिपण्णी करताच अवघ्या सभागृहात हास्याची लकेर उमटली.
एकाच वेळी शहरात आणि जिल्ह्यात 100 ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. तथापि शाहू महाराजांच्या प्रेमापोटी तब्बल 350 ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. तब्बल अडीच तास रंगलेल्या या ‘शाहू विचार महोत्सवाने’ उपस्थ्िात शाहू प्रेमींना खऱ्या अर्थाने ‘यशवंत’ केले.
शिवाजी विद्यापीठ व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती पाटील तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. व्ही.एस. शिंदे यांनी केले. मुख्य कार्यक्रमानंतर शाहीर सदाशिव निकम यांनी पोवाडा सादर केला.
