सुवर्ण सतेज संकल्पनेतून ५० हजार गरजूंना शाश्वत लाभ देण्याचा निर्धार!

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सतेज संकल्पनेतून जिल्ह्यातील ५०  हजार गरजूंना  शाश्वत लाभ देण्याचा निर्धार ना. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा प्रारंभ आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रे देऊन करण्यात आला.

 पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त पन्नास हजार लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यावेळी श्रम कार्ड, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकाम महामंडळ, कौशल्य विकास योजना, श्रावण बाळ योजना, बांधकाम कामगार योजना, संजय गांधी निराधार योजना, शेतकरी विमा, गडहिंग्लज येथील  नागरिकांना डस्ट बिन वाटप,  तसेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी अशा विविध योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचे वाटप यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले,  सत्तेचा फायदा सामान्य जनतेला झाला पाहिजे हा ध्यास घेऊन वाटचाल करत आहे. सामान्य नागरिक शासनाच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्धरित्या काम करावे.

  आमदार ऋतुराज पाटील यांनी, समाजकारण आणि राजकारणात वेगळ्या पद्धतीने काम करून ना.सतेज पाटील यांनी आमच्यासारख्या युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.   आजपर्यंत वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या  ६५ लाख वह्या १५ लाख  विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे ५० हजार गरजूंना  विविध योजनांचा लाभ देण्याचा करण्यात आलेला संकल्प  देखील सक्षमपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी, शासनाच्या विविध योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्या बरोबरच 60 वर्षांवरील नागरिकांना विमानाने तिरुपती दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे असे जाहीर केले. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांच्या वतीने, पाच इलेक्ट्रिक वाहन कचरा गोळा करण्यासाठी देण्याचे जाहीर केले. गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी, गोकुळ संचालकांच्यावतीने रुग्णवाहिका देण्याचं जाहीर केले तर गोकुळ संचालक अंजना रेडेकर यांनी आपल्या मेडिकल कॉलेजमधून रुग्णांना डोळ्यावर मोफत शस्त्रक्रियेचा लाभ देणार असल्याचे जाहीर केलं. इचकरंजीचे माजी नगरसेवक राहुल खंजीरे यांनी, इचलकरंजी मधील पाच हजार लाभार्थीना विविध योजनाच्या लाभाचे वाटप, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांनी बँकेच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. वैशाली महाडिक यांनी, महिला काँग्रेसच्यावतीन ५० हजार झाडे लावण्यात येतील असे सांगितले. माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भुदरगड काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई, विजयसिंह मोरे, सामजिक कार्यकर्ते अमर पाटील, रणजीत माने-पाटील, सदाशिवराव चरापले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य  जीवन पाटील, गडहिग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, प्राचार्य डॉ . महादेव नरके आदी मान्यवर उपस्थित होते.