मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना बोलवून घेतल्याचे समजते. ‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणाची संपूर्ण माहिती पवार गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून जाणून घेण्याबरोबरच पोलीस खाते दोषी सिद्ध झाल्यास वळसे-पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला केला होता. या हल्ल्याची पूर्वकल्पना असूनही यासंदर्भात पवार यांच्या निवासस्थानावर सुरक्षा वाढवण्याची किंवा हल्लेखोरांचा अटकाव करण्याची कोणतीही कृती पोलिसांनी केली नसल्याचा आरोप पोलीस खात्यावर होत असल्याने राज्य सरकारची आणि पोलिसांची नाचक्की होत आहे. गृहखाते संभाळणाऱ्या दिलीप वळसे-पाटील यांचे हे अपयश असल्याचे बोलले जात आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे म्हटलेच आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारने बुळबुळीत भूमिका घेणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. यामुळे राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून पवार यांनी तातडीने गृहमंत्री वळसे-पाटील यांना बोलावून घेतल्याने त्यांची उचलबांगडी होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनावर कारवाई करत असताना राज्यातील तपास यंत्रणा मात्र शिथील होत्या. देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरण, तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी बाहेर काढलेले फोन टॅपिंग प्रकरण, या प्रसंगी पोलीस यंत्रणेला आतापर्यंत कोणतीही धडाकेबाज कारवाई करता आलेली नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही गृहखात्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
त्यातच काल दरम्यान, विरोधी पक्षाने केलेले सिल्वर ओकवरील हल्ल्याचे समर्थन हा दळभद्रीपणा आहे, सदावर्तेंना भाजपचं पाठबळ असून कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. कालचा हल्ला म्हणजे सरकारने दाखवलेल्या संयमाच्या कडेलोटाचा परिणाम आहे असेही राऊत म्हणाले. कालच्या घटनेनंतर संजय राऊत हेही पवारांची भेट घेण्यास सिल्वर ओकवर पोहोचले आहेत.