कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या एकूण ६४४ सभासद संस्था प्रशासनाने अवसायनात काढल्या होत्या. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सहकारी दूध संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गेल्या होत्या. याची सुनावणी काल व निकाल आज होऊन या संस्थांना उच्च न्यायालयाने पात्र ठरवले.

त्यामुळे; अवसायनात काढलेल्या सर्वच संस्थांच्या पात्रतेचा म्हणजेच पर्यायाने मतदानाच्या हक्काचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाठीमागून लढणाऱ्या अदृश्य शक्तींना उच्च न्यायालयाने या निकालाद्वारे मोठी व जोरदार चपराक हाणली आहे.
सहाय्यक निबंधक – दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनातील संस्थांबाबतचे आदेश हे नैसर्गिक न्यायतत्त्वास धरून नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती श्री. शैलेश ब्रह्मे यांनी हा निकाल दिला.
या दूध संस्थांच्या भवतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. भूषण मंडलिक, ॲड. प्रबोध पाटील, ॲड. धैर्यशील पवार आणि सरकारच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी काम पाहिले.
आज बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमाराला निकाल जाहीर होताच या संस्था प्रतिनिधींनी सहनिबंधक कार्यालय (दुग्ध) समोर गुलालाची उधळण व फटाके वाजवून आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
=========
