छत्रपती शाहू महाराजांचा अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा घाटगे घराण्याने जोपासला ;

कागल ( प्रतिनिधी ) : पोथ्या,पुराण,ओव्या,अभंग, श्लोक ही आपल्या संस्कृतीची कवचकुंडले आहेत. यांची लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी अत्यंत आत्मीयतेने जोपासना केली.त्यांच्या पश्चात त्यांचे नातू स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आणि पणतू राजे समरजीतसिंह घाटगे अत्यंत प्रभावीपणे राबवित असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.पुरूषोत्तम पाटील महाराज ( बुलढाणा ) यांनी काढले.

येथील जयसिंगराव घाटगे संकुल येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवांतर्गत आयोजित किर्तन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सांगलीच्या कलाकारांनी सादर केलेल्या दिंडी सोहळ्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पुरूषोत्तम महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायात हरिपाठाला फार मोठे महत्त्व आहे.आज टाळ, मृदुंगासोबत हरिपाठाचे गायन होत आहे.मात्र त्यातले तत्त्व समजून न घेतल्यामुळे समाजाची वैचारिक श्रीमंती हरिपाठातच पडून राहिली आहे.त्यामुळे हरिपाठात लपलेले मानवी जीवनाचे सार अलौकिक आहे ते आजच्या पिढीने समजावून घेण्याची गरज आहे. आज आपल्या पश्चात आपल्या घराण्याने अध्यात्माचा वसा आणि वारसा मोठ्या दिमाखामध्ये अखंडपणे सुरू ठेवल्याचे पाहून स्वर्गातसुद्धा शाहू महाराजांना अत्यानंद होत असेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पुरुषोत्तम महाराज यांनी तीन तासांच्या प्रबोधनपर कार्यक्रमातून समाजविघातक अनेक सामाजिक रूढी ,परंपरांचा आपल्या खुमासदार विनोदी शैलीतून खरपूस समाचार घेतला.

यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे,सौ.नंदितादेवी घाटगे,विरेंद्रसिंहराजे घाटगे,अखिलेशराजे घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.

या ठिकाणी कृषी प्रदर्शनस्थळी दोनशेहून अधिक स्टाॕल मांडलेआहेत. खते, बियाणे, औषधे,घरगुती वापरातील वस्तू,दिवाळीसाठीचे साहित्य,खाद्य पदार्थ ,बालचमुंसाठी फनी गेम्स,खाद्य पदार्थ उपल्बध आहेत.रविवार पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.

टॕलेंट हंटलाही प्रतिसाद

स्थानिक कलाकारांच्या सुस्त गुणांना वाव देण्यासाठी टॅलेंट कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये दोनशेहून अधिक कलाकारातून पन्नास निवडक कलाकारांनी कला सादर केली. यामध्ये लावणी,पोवाडा, सनई,ढोलकी हलगी-घुमके,तबला वादन,लेझीम,नृत्य आदींचा समावेश होता.