
कोल्हापूर : काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या यात्रेची मदत होईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.ते कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, या यात्रेवरही टीका झाली. परंतू, राहूल गांधींची यात्रा केवळ काँग्रेसपुरती राहिली नाही. महाराष्ट्रात जयंत पाटील, सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. गांधी विचार मानणाऱ्या संस्था, संघटनाही सहभागी झाल्या. सामान्यांनी या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याने भाजपने त्यांच्याविषयी केलेल्या दूषित वातावरणाला चांगले उत्तर मिळाले.
सत्तेवर आल्यानंतर पाय जमीनीवर हवेत. तुरूंगात घालीन, जामीन रद्द करतो ही राजकीय नेत्यांची भूमिका असू शकत नाही. कोणीही टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. राज्यपाल कोश्यारी हे त्या पदावर नाशुष आहेत. असा प्रश्न विचारला असता, राज्यापालांविषयी आम्हीही नाखूश आहोत, असा मिश्कील टोला पवार यांनी लगावताच पत्रकारांमध्ये मोठा हशा पिकला. उत्तम राज्यपालांची महाराष्ट्राला पंरपरा होती. परंतू हे असे पहिले राज्यपाल आहेत की ज्यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
