
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला. पण कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मलिक आता हायकोर्टात धाव घेणार आहेत.
दरम्यान, मलिकांचा जामीन फेटाळण्यात आला असला तरी त्यांची तुरुंगात रवानगी होणार नाही, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु राहणार आहेत.वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज केला होता, तसेच ईडीच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण मुंबईच्या सत्र न्यायालयानं त्यांना जामीन देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, प्राथमिकदृष्ट्या याप्रकरणी तपास यंत्रणांनी जे पुरावे गोळा केले होते, त्यानुसार त्यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं दिसतंय. त्यामुळं अशा परिस्थितीत त्यांना जामीन देण्यास कोर्टानं नकार दिला आहे.
न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी काही महिने सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टानं आज निकाल दिला.नवाब मलिकांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळं पुढील निर्देश येईपर्यंत त्यांच्यावरील उपचार सुरुच राहणार आहेत. त्यामुळं त्यांचा जामीन अर्ज फेटळण्यात आला असला तरी त्यांची रवानगी लगेच तुरुंगात होणार नसून ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत.दरम्यान, सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात आता तातडीनं हायकोर्टात धाव घेणार असल्याचं मलिकांच्या वकिलांनी म्हटलं आहे.