
मुंबई : गोरेगाव येथील मनसे गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून केलेली नक्कल ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या या टीकेबद्दल खंत व्यक्त केली असुन राज ठाकरे काहीही बोलले तरी मी त्यावर फार बोलणार नाही. माझे संस्कार तसे नाहीत. त्यांनी तर एकेकाळी आजोबांचं जेवणही काढलं होतं अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
गोरेगाव येथे मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचीच नक्कल केली होती. मुख्यमंत्री असताना तब्येतीचं कारण सांगून ते घरात बसत होते. एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून कांडी फिरवली तेव्हा कळलं. तेव्हा ते घरात बसत होते, पण आता सगळीकडे फिरत आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, जी व्यक्ती आरोग्याचं कारण सांगून लोकांना भेटत नव्हती. तीच व्यक्ती मुख्यमंत्री पद गेल्यावर व्यवस्थित झाली. ज्यावेळेला लोक सांगायचे, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायच आहे. तेव्हा पण ते भेटत नव्हते. हा विषय आरोग्य किंवा प्रकृतीचा नाही. तर त्यामध्ये मला काय म्हणायचंय हे समजून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.