कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे. माननीय कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी जागतिक कीर्तीचे लाईफ कोच, प्रेरणादायी वक्ते आणि बी.ए.पी.एस. स्वामीनारायण संस्थेचे पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी प्रमुख अतिथी असून ते दीक्षांत भाषण करतील.
”
डी. वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथील मैदानावर सायंकाळी ५ वाजता या समारंभाला सुरुवात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून नॅक “ए प्लस प्लस’ व क्यूएस-आय गेज डायमंड अशी सर्वोच्च मानांकने प्राप्त केली आहेत. एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाने उच्च स्थान प्राप्त केले आहे. पीएच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय, परिचारीका, भौतिक उपचार व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी आरोग्य व पूरक सेवेत कार्यरत आहेत. विद्यापीठात सातत्याने नवनवीन संशोधन सुरु असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी यावेळी दिली.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले जीवन अध्यात्म आणि समाजसेवेसाठी अर्पण केले. स्वामीजींची प्रभावी व प्रेरक विचार आणि ओजस्वी वक्तृत्वशैली यांमुळे जगभरातील असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे.
गेल्या ३० हून अधिक वर्षांमध्ये त्यांनी १५ हजार पेक्षा अधिक जीवनविकास विषयक व्याख्याने दिली असून ३० हून अधिक देशांमध्ये लाखो व्यक्ती व नेत्यांना प्रेरित केले आहे. नेतृत्व, तणाव व्यवस्थापन, नैतिक मूल्ये, कौटुंबिक संस्कार, टीमवर्क आणि सर्वांगीण यश या विषयांवर त्यांचे मार्गदर्शन विशेष प्रभावी ठरले आहे. ते एक लोकप्रिय स्तंभलेखक असून अनेक दैनिकांमध्ये त्यांचे साप्ताहिक लेख प्रसिद्ध होतात. जागतिक स्तरावर सोशल मीडियावरही त्यांची प्रभावी उपस्थिती आहे. ते एक नामवंत लेखक देखील आहेत. “INSPIRED: DAILY WISDOM for HOLISTIC LIVING” हे त्यांनी अलीकडेच लिहिलेले पुस्तक प्रकाशित होताच काही तासातच अमेझोनवर ‘बेस्ट सेलर’ ठरले. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक मानद डॉक्टरेट पदव्या आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अमेरिका आणि कॅनडा येथील विविध शासकीय संस्थांनी त्यांना अनेक प्रतिष्ठित सन्मानपत्रे आणि गौरव प्रदान केले आहेत.
७४१ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
तेराव्या दीक्षांत समारंभात एकूण ७४१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी १७ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असून १४ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. जागिरदार, डॉ. विनय वाघ आणि डॉ. मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत. संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. तन्वी संजय देसाई यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिली.
