बेलेवाडी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या दि. एक डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३४०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. या पंधरवड्यात गाळप झालेल्या ९६, ४९५ उसाच्या बिलापोटी एकुण रू. ३३ कोटी रक्कम बँकांमध्ये संबंधित ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केली आहे. तोडग्यानुसार प्रतिटनाला रू. १०० गळीत हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहेत. अशी प्रतिटनाला एकूण रू. ३, ५०० ॲडव्हान्स होणार आहे. या तिसऱ्या पंधरवड्यात कारखान्याने ९६, ४९५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान; १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष श्री. नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, तोडग्यानुसार रु. ३४०० पहिला हप्ता आणि उर्वरित रू. शंभर कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर असे प्रतिटनाला एकूण ॲडव्हान्स रु. ३५०० दिले जाणार आहेत, असे जाहीर केले होते. त्यानुसार, सरसेनापती सताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळप हगाम २०२५-२६ मध्ये दि. एक डिसेंबर ते दि. १५ डीसेंबर अखेर गाळपास आलेल्या ९६, ५४९ मेट्रिक टन उसाची बिले प्रतिटन रू. ३४०० प्रमाणे एकूण ऊसबिल रू. ३३ कोटी अदा केली आहेत. तसेच; तोडग्यानुसार द्यावयाचे उर्वरित रू. १०० गाळप हंगामानंतर अदा करणार आहोत. आज मंगळवारपासून दि. ३० शेतकऱ्यांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा व ऊस बिलाचे पैसे घेऊन जावेत.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आज अखेर ३, ८१, ७७५ मेट्रीक टन इतके गाळप केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा १३.४० टक्के आहे व सरासरी ११.८९ टक्के आहे. दि. ३० नोव्हेंबर अखेर एकूण २,०४,८१० मेट्रिक टनांची उसबिले यापूर्वीच अदा झालेली आहेत. अशाप्रकारे आजअखेर ३,०१,३०५ मेट्रिक टनांची उसबिले अदा झालेली आहेत.
चालू हंगामात आज अखेर को-जन प्रकल्पातून तीन कोटी, २१ लाख युनिट इतकी वीज निर्मिती करून दोन कोटी, १८ लाख युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे. डीस्टीलरी प्रकल्पातून या हंगामात दोन कोटी लिटरस इथेनॉल उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज अखेर या प्रकल्पातून ६७ लाख लिटर इथेनॉल उत्पादित झाले आहे.
चालू हंगामात सरसेनापती साखर कारखान्याने सात लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असून शेतक-यांनी आपण पिकवलेला संपूर्ण उस सरसेनापती साखर कारखान्याकडे गाळपास पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुश्रीफ यांनी केले आहे.
