भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भंडाऱ्यात पहिला मेळावा पार पडला. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर भंडाऱ्याचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्यात.
महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापर करू नका. यासाठी लागणाऱ्या गाडीच्या खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करावे आणि केवळ निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात आल्यात.
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास आज उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल
यावर नाना पटोलेंनीही कार्यकर्त्यांनी केवळ पद न देता त्यांची जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडावी आणि पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येयधोरण गाव पातळीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावे, अशा कानपिचक्या घेतल्यात. नानांनी कार्यकर्त्यांनी पाच वर्ष मेहनत घ्या, पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असा ठाम विश्वासाचा बूस्टर डोस यावेळी कार्यकर्त्यांना दिला.