शंभर टक्के मतदानासह पारदर्शक व भयमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन करा :  जिल्हाधिकारी 

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 मधील मतदान टक्केवारीत वाढ करत यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व 100 टक्के मतदार मतदान केंद्रात जावून मतदान करतील. तसेच सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडेल यासाठी सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नोडल अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. 

 

ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणूकीचा अनुभव सोबत घेऊन कोणकोणत्या स्तरावरती अडचणी आल्या त्या सोडवून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेचे पालन, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे योग्य पालन होईल याची खात्री करा. मतदार याद्या अंतिम करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत मतदारांच्या अडचणी सोडविल्या जातील याविषयी प्राधान्याने लक्ष द्या. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आलेले सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मतदार जनजागृती, प्रशिक्षण नियोजन, आचारसंहिता व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, जिल्हा सुरक्षा आराखडा, मतदान कर्मचारी डाटाबेस तयार करणे, ईव्हीएमची सरमिसळ, निवडणूक प्रक्रिया कर्मचारी नियुक्ती व व्यवस्थापन, इव्हीएम मागणी व प्राथमिक तपासणी, ईव्हीएम विधानसभा मतदार संघाना वाटप करणे, स्ट्रॉगरुम व्यवस्थापन, मतमोजणी केंद्रे व्यवस्थापन, बॅलेट पेपर, पोस्टल, गृहमतदान, मतदार याद्या अनुषंगिक सर्व कामकाज या अनुषंगाने सूचना दिल्या. तसेच निवडणूक साहित्य मागणी, उपलब्धता, वाटप व व्यवस्थापन, वाहतुक व्यवस्था, निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन, मीडिया व संपर्क व्यवस्थापन व सोशल मीडिया, निवडणूक निरीक्षक यांची व्यवस्था व दौरा, तक्रार निवारण व मतदार मदत केंद्र, संपर्क व्यवस्थापन, संगणकीकरण सायबर सिक्युरिटी आणि माहिती व तंत्रज्ञान, एक खिडकी योजना, सैनिक मतदारांच्या टपाली मतपत्रिकांचे अनुषंगाने संबंधित अभिलेख संपर्क साधणे, दिव्यांग मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रावरील किमान सुविधा याबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

*नवीन मतदारांना 19 ऑक्टोंबर पर्यंत नोंदणी करता येणार*

 

कोल्हापूर जिल्ह्यात आज रोजी 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत. तर तृथीयपंथी मतदार 183 आहेत. 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 72 हजार 566 असून सैनिकी मतदारांची संख्या 8 हजार 636 आहेत यामध्ये पुरुष 8 हजार 367 व महिला 269 आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या 27 हजार 120 असून 85 व अधिक वयोगाटातील मतदारांची संख्या 38 हजार 349 आहेत. नवीन मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी. तसेच मतदार यादीमधील नावांमधील दुरुस्ती, नावांचे स्थलांतर सुध्दा या कालावधीमध्ये करता येणार आहे.

 

 

*मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री मतदारांनी करावी*

 

मतदान ओळखपत्र असणे म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार नसून त्याकरिता मतदार यादीत त्या मतदाराचे नांव असणे आवश्यक आहे. मतदानाकरिता आलेल्या मतदाराचे नांव मतदार यादीत असल्यास त्याने एकूण 12 प्रकारचे ओळखीचे दस्तावेज / ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास त्याला मतदान करता येईल. फक्त फोटो वोटरस्लीपच्या आधारावर मतदान करता येत नाही. त्या सोबत मा. आयोगाने निर्देशित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयाचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, लोकसंख्या नोंदणी अंतर्गतचे स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेले निवृत्ती विषयक कागदपत्र, छायाचित्र असलेले शासकीय ओळखपत्र, संसद/ विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, युडीआयडी कार्ड या 12 प्रकारच्या ओळखपत्राचा समावेश आहे.

 

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी कुठल्याही निवडणूक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर किंवा Voter Helpline या अॅपवर अत्यंत सुलभतेने नाव असल्याची खात्री करता येते. तसेच मतदार यादीत आपले नाव नसल्यास अथवा तपशिलात काही चूक झाली असल्यास अर्ज करता येईल.

***