नवी मुंबई: मुख्यमंत्री असताना कोळी भवनासाठी आमच्या सरकारने भूखंड दिला होता. आज त्यावर अतिशय सुसज्ज असे कोळी भवन उभे राहते आहे ही आनंदाची बाब आहे. हे कोळी भवन नवी मुंबईतील सर्वात सुंदर असे भवन बनवण्यासाठी नियोजित 20 कोटींऐवजी आणखी 10 कोटी लागले तरी ते आम्ही देऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नवी मुंबईतील भूमिपूत्र-प्रकल्पग्रस्त, कोळी-आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याकरिता सुसज्ज अशा ‘कोळी भवना’चे ऐरोली, नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भूमिपूजन केले. यावेळी उपस्थित कोळी-आगरी बांधवांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, अटल सेतुच्या निर्मितीदरम्यान कोळी बांधवांना होणाऱ्या नुकसानासंबंधी ₹25 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. यासोबतच कोणत्याही प्रकल्पाच्या निर्मितीदरम्यान कोळी समाजाला नुकसानभरपाई देण्यासाठी धोरणदेखील तयार केले. मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच कोळी समाजाच्या हिताचा विचार झाला, यातून मच्छिमारांसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र मंंत्रालय तयार करण्यात आले. ‘नीलक्रांती’च्या माध्यमातून मत्स्य संपदा योजना, अनेक फिशिंग जेट्टी व हार्बर तयार करण्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रातही राज्य सरकार 2 फिशिंग हार्बर तयार करत आहे. यावेळी देशातील सर्वात मोठे पॅकेज ‘वाढवण’ प्रकल्पातील मच्छिमारांना देणार असून कोणालाही विस्थापित होण्याची गरज पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
नवी मुंबईचा विकास करत असताना शहराच्या आणि येथील भूमिपुत्रांच्या गरजा लक्षात घेऊनच योजना करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे तसेच आ. गणेश नाईक जी आणि आ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या मागण्यांच्या पाठीशीदेखील भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वस्त केले.
यावेळी खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक जी, आ. प्रवीण दरेकर, आ. मंदाताई म्हात्रे, आ. निरंजन डावखरे, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.