पैसे परत न केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण !

कोल्हापूर: गारगोटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हॉटेल व्यावसायिकाला धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  या प्रकरणी रवींद्र राजाराम सुतार, विजय नारायण भास्कर (रा.गारगोटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल व्यावसायिक मारुती पावले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा अमोल पावले हा मंगळवारी (दि.17) रोजी आपली थार गाडी घेऊन हॉटेल कडे जातो म्हणून सांगून गेला होता. मारुती पावले हे हॉटेलकडे गेले असता त्यांचा मुलगा व गाडी आढळून आली नाही. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अमोल कोल्हापूरला गेला असेल असे समजून मारुती पावलेही कामाला लागले. त्यानंतर एका मोबाईल नंबर वरून रवींद्र सुतार यांनी फोन करून “मुलगा अमोल माझ्या ताब्यात आहे विजू भास्कर चे पैसे कधी देणार? तुझ्या मुलाचे बरे वाईट झाले तर आम्हाला विचारायचे नाही, तुझ्या मुलाला डांबून ठेवलय ” अशी धमकी देऊन फोन ठेवला.

थोड्यावेळाने रवी सुतार यास फोन करून विचारले असता तो म्हणाला की, तुझ्या मुलांने पैसे घेतले आहेत. पैसे बुडवायची तुझी प्रवृत्ती आहे का ? पैसे आण आणि मुलाला घेऊन जा. असे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत मारुती पावले यांनी पत्नीला विचारले असता अमोलने पैशाच्या व्यवहाराबाबत काही सांगितलेले नाही. काही वेळाने विजय भास्कर यांचाही एका मोबाईल नंबर वरून धमकीचा कॉल आल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र सुतार व विजय भास्कर या दोघा विरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.