कसबा बावड्यातील हनुमान तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी रु.३ कोटी ३० लाखांच्या निधीस तत्वत: मान्यता; राजेश क्षीरसागर यांचा यशस्वी पाठपुरावा

कोल्हापूर : कसबा बावड्यातील हनुमान तलावाची गेल्या अनेक वर्षात अत्यंत दुरावस्था झाली आहे. तलावाच्या आजूबाजूचे सांडपाणी मिसळत असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. या पाण्यास दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार या तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनास देण्यात आल्या होत्या. पर्यावरण विभागाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेतून सुकाणू समितीमार्फत कसबा बावड्यातील हनुमान तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी रु.३ कोटी ३० लाखांच्या निधीस तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

 

 

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, या तलावाचे संवर्धन सुशोभिकरण व्हावे, ही कसबा बावडा वासीयांची मागणी पूणर्त्वास येत आहे. मंजूर निधी मधून तलावाच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे, तण काढून टाकणे, सांडपाणी रोखण्यासाठी सरंक्षक भिंत उभी करून सांडपाणी दुसऱ्या मार्गाने निर्गत करणे, दगडी बांधकाम, घाटाचे सुशोभिकरण, फिरण्यासाठी फुटपाथ निर्माण करणे, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, सुशोभीकरणासाठी बेंचेस बसविणे, सोलर लाईट बसविणे, कचराकुंडी, दिशादर्शक फलक, ओपन जिम, लहानमुलांची खेळणी बसविणे, पर्यावरणासाठी जल शुद्धीकरणासाठी उपयुक्त झाडे लावणे आणि विरंगुळ्यासाठी बोटिंग सुरु करणे आदी कामे केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात हनुमान तलावाचे रूप पालटलेले पहावयास मिळेल, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.