गांधी कुटुंबियांसोबत माझे चांगले संबंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चांगल्याच फैरी झाडल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या टीकाटिप्पणीवर भाष्य केले.

तसेच गांधी कुटुंबियांसोबत असलेल्या संबंधाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. “माझे सर्वांशी खूप चांगले संबंध आहेत. त्यामध्ये गांधी कुटुंबियांसोबतही चांगले संबंध आहेत. त्यांच्या अडचणीच्या काळात मी नेहमीच त्यांच्यासोबत असतो. आपले कोणाशीही वैयक्तिक वैर नाही”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

“२०१९ च्या निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अडचण आली होती. त्यावेळी राहुल गांधी यांना फोन करत विचारपूस केली होती. त्यानंतर एकदा काशीमध्ये सोनिया गांधी माझ्या विरोधात प्रचार करत होत्या. मात्र, अचानक त्यांची तब्येत बिघडल्याचे मला संमजले. त्यानंतर मी त्यांना विशेष विमान देण्याचे सांगितले होते”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “एकदा सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टर दमणमध्ये क्रॅश झाले होते. त्यामध्ये सोनिया गांधी आणि अहमद पटेल होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी त्यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा मी ताबडतोब एअर अँम्ब्युलन्सची व्यवस्था करतो, असे म्हंटले होते. मात्र, आम्ही सुरक्षित आहोत. फक्त हेलिकॉप्टरचे नुकसान झाले , असे त्यांनी सांगितलं होते”, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले .

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या हातातून लोकसभा निवडणूक निसटली आहे. त्यांनी दहा वर्षांपूर्वी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते साफ खोटे ठरले. नोटबंदी केली, जीएसटी लादली, आणि व्यापाऱ्यांच्या भल्याचे निर्णय घेतले. ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येत आहे. आमचे सरकार (इंडिया आघाडीचं) आल्यानंतर १५ ऑगस्ट पर्यंत केंद्रातील ३० लाख नोकर भरती करण्यात येईल”, असे राहुल गांधी प्रचारात म्हंटले होते.