उद्धव ठाकरेंना आता आत्मपरीक्षणाची गरज : आशिष शेलार

काँग्रेसचे हात मराठी माणसांच्या रक्ताने माखलेले असून त्याच हाताशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील एका प्रचारसभेत ते बोलत होते.

“अनेक बहुरुपी नेते या निवडणुकीत बघायला मिळाले आहे. काळ बदलला की रंग बदलतो हे माहिती होतं, मात्र, काही लोक अर्धा-अर्धा तासाने रंग बदलत आहेत. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, भाजपावर खरे खोटे न पाहता आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातले नंबर एकचे बहुरुपी हे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तर दोन नंबरचे बहुरुपी  म्हणजे संजय राऊत आहेत”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.