काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार : प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर कराडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी  सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्यपाल व्हायचं आहे, असा गौप्यस्फोट यांनी केला.

डॉ. आंबेडकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा बडा नेता लवकरच भाजप प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा हा नेता कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे आता राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आंबेडकरांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने आता संपूर्ण राज्याच्या नजरा या बड्या नेत्याकडे लागल्या आहेत.

बड्या नेत्याच्या नसानसात काँग्रेसचे विचार भिनले आहेत आणि हा नेता घटनात्मक पदासाठी भाजपमध्ये जाईल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना राज्यात, देशात जातीयवादी उमेदवार व सरकार निवडून येऊ नये यासाठी जातीयवादी विचारसरणीच्या उमेदवारांना थारा देऊ नये अशी विधानेही त्यांनी अनेक वेळा केली आहेत. त्यामुळे हा नेता खरंच भाजपच्या वाटेवर आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सातारची गादी ही सिम्बॉलिक आहे, असेही प्रकाश आंबेडकर वक्तव्य केले आहे. वंचित आघाडीने लोकसभेला कोल्हापूरच्या शाहू महाराज यांना पाठिंबा दिला. सातारच्या उदयनराजे यांना पाठिंबा का दिला नाही, असा प्रश्न विचारला असता त्यावर यावर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांनी सातारची गादी ही सिम्बॉलिक आहे. कोल्हापूरच्या गादीने देशाला एक दिशा दिली आहे. देशाची रचना, समाज व्यवस्था यामध्ये शाहू महाराजांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. यामुळे कोल्हापुरात पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जात आहे.