22 जानेवारीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव…

नवी दिल्ली: मोठी बातमी समोर येत आहे. उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं लाखो भाविक अयध्योमध्ये दाखल झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्तान राज्य सरकारकडून राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधात आता कायद्याच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देण्यात आलेल्या राज्यातील सार्वजनिक सुट्टीला कायद्याच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलं आहे. शिवांगी अग्रवाल, सच्च्यदित साळवे, वेदांत अग्रवाल, कृषी बांगिया यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अशाप्रकारची सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्तानं देता येऊ शकते, परंतु एका धार्मिक कार्यक्रमासाठी अशा पद्धतीनं सुट्टी जाहीर करणं चुकीचं आहे. या सुट्टीमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे नुकसान होईल असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सुट्टीकालीन खंडपीठानं यावर सुनावणी तातडीनं करावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.