कोल्हापूर : मराठा समाज हा सर्वप्रथम मागास आहे हे सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी केले.मराठा समाज हा सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण मिळणे अवघड आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
यापूर्वी दिलेली आरक्षणे ही न्यायालयात रद्द ठरली आहेत. यामागे मुख्य कारण हा समाज सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचे सिद्ध करण्यात सरकारला आलेल्या अडचणी आहेत. या अडचणी दूर करणे हे आरक्षण मिळण्यातील मुख्य काम आहे.
दरम्यान सध्या राज्यात आरक्षणासाठी विविध जात समूहांच्या सुरू झालेल्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले, की सरकारने मराठा, धनगर, ओबीसी याच्या आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावेत. या वर्गाला केवळ झुलवत ठेवू नये. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिले जावे, असेही ते या वेळी म्हणाले.
घटना दुरुस्तीशिवाय अशक्य दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारच्या मनात काय आहे हे माहीत नाही. पण आरक्षण कसे देणार हे सर्वाना कळले पाहिजे. घटना दुरुस्तीशिवाय ते मिळू शकणार नाही हेही खरे आहे, असे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले.