संजय पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भारत राष्ट्र समितीत प्रवेश

कोल्हापूर : कामगार कष्टकरी वंचितांचे शोषितांचे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लक्षवेधी आंदोलन करणारे संजय पाटील यांनी आज भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक दादा कदम पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला.

संजय पाटील यांनी आजपर्यंत वीस वर्षात 500 हून अधिक आंदोलने करून, आंदोलनाचा पाठपुरावा करून शेकडो आंदोलनातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. महाराष्ट्रामध्ये तेलंगणा पॅटर्न राबवावा व तळागाळात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थान मिळावे अशी भावना अपेक्षा ठेवून पक्षामध्ये प्रवेश केल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले,महाराष्ट्रातील 18 घराणी राज्यावर गेली 40 वर्षे राज्य करत आहेत.रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी भारत राष्ट्रसमिती हा सक्षम पर्याय आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिक दादा कदम म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील इथून पुढचे सर्व निर्णय मग ते निवडणुका असो नेमणूक असो अथवा पक्ष वाढवणे संबंधाने कोणते विषय असो संजय पाटील यांना विचारल्याशिवाय पानही हलणार नाही.यावेळी त्यांनी तेलंगणामध्ये ज्या विविध योजना शेतकरी कष्टकरी कामगार दलित दिव्यांग अल्पसंख्यांक त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. संजय पाटील यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देत आहोत असे त्यावेळी त्यांनी जाहीर केले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून ते काम करतील. त्यांचा आजवरचा संघर्ष पाहता चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घेता संजय पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा लढवावी असेही ते यावेळी म्हणाले.समन्वयक बाळासाहेब देशमुख म्हणाले, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे सरकार मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्ट करावे कार्यकर्त्यांचा विमा उतरवणारा देशातील एकमेव पक्ष भारत राष्ट्र समिती आहे. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आर्थिक अडचण भासणार नाही अशा दृष्टीने पक्षाने नियोजन केले आहे. पदरमोड करून काम करावे लागणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने संजय पाटील यांच्या रूपाने आम्हाला सक्षम पर्याय मिळाला आहे असेही ते म्हणाले. यावेळी संजय पाटील समर्थकांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक तोहिद बाक्सू , युवा नेते साईराज पाटील, सौरभ पवार, गजानन हवालदार, सतीश मोटे, मिरासाहेब सय्यद, सुनील दावणे ,अनिल कवाळे, संग्राम जाधव, रवी चव्हाण, संजय चौगुले ,आनंदराव साळुंखे, अनिल कांबळे, बंकट थोडके यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

🤙 8080365706