
मुंबई : कोरोनाच्या काळातही ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यामुळे त्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्या कारभारावर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. भाजपने काही पोपट पाळले आहेत. ते बोलत असतात. राज ठाकरे हे विश्वनेते आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू दया. पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे ना. त्यावरही या भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेते वाहत आली. गुजरातला स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागण राज ठाकरे यांनी करायला हवी. ते जगाचे नेते आहेत. ते ट्रम्पवरही बोलू शकतात. करा मागणी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
