
चंद्रकांत पाटलांवर हायकमांड नाराज
मुंबई : बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, हे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचे हायकमांड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीव्र नाराज असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना तसे स्पष्ट संकेत दिलेत.येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त वक्तव्ये टाळा, अशी सक्त ताकीद अमित शहांनी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना हे वक्तव्य भोवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आशिष शेलार काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे-शरद पवार भेट,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा झाली. यावेळी अमित शहा यांनी पाटील यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. येणाऱ्या काळात निवडणुका आहेत. त्यापूर्वी भाजप नेत्यांकडून अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांवर पाणी फेरले जात आहे. हेच पाहून अशी वक्तव्ये टाळण्याची सक्त ताकीद अमित शहांना दिली आहे. तसेच नेत्यांनी फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्याच कामावर बोलावे ,असे स्पष्ट निर्देशही अमित शहा यांनी दिल्याचे समजते.
