
कोल्हापूर : गेल्या अनेक आरोप प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू ठरलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला आजपासून (२० मार्च) सुरु होत आहे.
23 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 25 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या आणखी रंगणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी कट्टर राजकीय वैर असलेल्या आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गटामध्ये थेट लढत होत आहे.
त्यामुळे सत्तांतर होणार की, महाडिक पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. दुसरीकडे, सभासदांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते.त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी महाडिक गटाला दिलासा दिला. दरम्यान, निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. आजपासूनच ( 20 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
