
मुंबई : महाराष्ट्रात उद्योग वाढवायचे असतील तर कामात पारदर्शकता हवी. पण आपल्याकडे मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, असा उद्वेग केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

ही संत, साहित्यिक, समाजसुधारक, उद्योजक, विचारवंत, संशोधकांची भूमी आहे. तिला निर्माणकर्त्यांची भूमी बनवू या, निर्यातक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा तयार करू या, असे आवाहन त्यांनी विश्व मराठी संमेलनातील गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात केले. संमेलनाच्या सांगतेवेळी ते म्हणाले. मराठीचे मोठेपण महाराष्ट्रात राहून समजत नाही, पण महाराष्ट्राबाहेर गेल्यावर त्याची जाणीव नक्कीच होते. इथले नाटक, साहित्य, काव्य आठवते. आज शहरीकरण वाढले असले तरी ग्रामीण भागात विकासाचा वेग कमी आहे.
कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, श्रीमंत कर्णसिंग सरदेसाई जंभोरीकर, धनश्री जंभोरीकर, जपानचे पहिले भारतीय आमदार योगेंद्र पुराणिक, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संदीप दीक्षित, सुरेश चव्हाण, आनंद गानू, विजय पाटील आदी मंडळी उपस्थित होती.
