खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा;आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल तालुक्यातील खडकेवाडा व बेळुंकी येथील गावठाणातील भूखंड धारकांची प्रलंबित मालकी हक्काची मागणी नियमित करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात झालेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ अशा संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

याबाबत अधिक माहिती अशी, गावातील घरे नसलेल्या २५ जणांना गावठाणातील भूखंडांची ताबापट्टी मिळून, त्यावरती ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. परंतु; त्यांना अद्यापही मालकीपत्रे मिळालेली नाहीत. हा प्रश्न तातडीने निकालात काढण्याच्या सूचना आमदार मुश्रीफ यांनी दिल्या.तसेच, दुसऱ्या टप्प्यातील ३२ भूखंडापैकी १४ ग्रामस्थांनी घरे बांधलेली आहेत. त्यांनाही अद्याप कब्जेपट्टी मिळालेली नाही. आठ भूखंडधारकांनी शर्तभंग केलेली आहे. तसेच, दहा भूखंड मोकळे आहेत. या सर्वांना सनदशीर मार्गाने वहिवाटीनुसार त्यांची मालकी हक्कपत्रे देण्याच्या सूचना आमदार मुश्रीफ यांनी केल्या.

या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे, कागलच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, सरपंच भाऊसाहेब पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील, हरी कुंभार, प्रल्हाद पाटील, युवराज जाधव, सतीश कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते.खडकेवाडा व बेळुंकी ता. कागल येथील गावठाणातील भूखंड धारकांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

🤙 9921334545