
कोल्हापूर : आगामी काळात कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही. पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

शेट्टी म्हणाले, सत्तेसाठी आपण राजकारण करणार नाही. चळवळीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमानी संघटनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना बळ आले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका संघटनेची असणार आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेषत: सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात मतांच्या घोडेबाजाराचा ट्रेंड आला आहे. यावर शेट्टी म्हणाले, आपण अशा ट्रेंडच्या पाठीमागे लागणार नाही. जन्मत: आमचे रक्त चळवळीचे आहे. चळवळीतून आपण मोठे झालो आहोत. आगामी काळात राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार असल्याचेही ते म्हणाले.