
माळेगाव: बारामती-पाहुणेवाडी हद्दीतून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पुलावरून शाळकरी मुलींच्या सहलीची बस (ट्रॅव्हस) आज पाहटे चार वाजल्याच्या सुमारास कोसळली. या अपघातात ३ मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या असून जखमी विद्यार्थिनी इंचलकरंजीच्या आहेत.

बारामती महिला हाॅस्पीटलमध्ये जखमी मुलींवर पुढील वैद्यकिय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.अपघातग्रस्त यशदा ट्रॅव्हलमध्ये एकूण ४८ मुली, पाच शिक्षक प्रवास करीत होते. तसेच दोन चालकांपैकी श्रीपाद पाटील हा अपघातग्रस्त ट्रॅव्हल चालवित होता. पहाटेच्यावेळी चालकाच्या डोळ्यावर झोप लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा, अथवा रस्त्यावरील पुल व वळणाचा आंदाज न आल्याने वरील अपघात घडला असावा,असा आंदाज प्रथमदर्शनी पोलिसांनी वर्तविला आहे.विशेषतः घटनेचे गांर्भिय विचारात घेत माळेगाव, वडगाव निंबाळकर आणि बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशीच्या मदतीने पोलिसांनी १०८ रुग्णवाहिके बरोबरच पोलिस गाडीतून संबंधित अपघातग्रस्त मुलींना बारामती महिला रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती केले. या बाबत अधिक माहिती सांगता पोलिस निरिक्षक किरण अवचर म्हणाले, “इचलकरंजी-कोल्हापूर येथील खासगी सागर क्लासेसची ८ वी ते १० इयत्तेमधील मुलींची सहल यशदा ट्रॅव्हलमधून शिर्डी येथे गेली होती. सदरची सहल संपवून आज मंगळवारी पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स बारामतीकडून फलटण मार्गे निघाली होती. वरील ट्रॅव्हलच्या चालकाचा पाहुणेवाडी येथील पुलावर गाडीचा ताबा सुटला. गाडी ओढ्यात कोसळली. त्यामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून २४ मुलींना किरकोळ शारिरीक इजा झाली आहे. सध्यातरी कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.
“रस्त्याची दुरावस्था अपघाताला कारणीभूत
पाहुणेवाडी येथील पुलाची दुरावस्था पाहत नाही. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे जीवघेणे झाले आहे. दिशादर्शक फलक नाहीत. परिणामी सातत्याने लाहनमोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली, तर रस्त्याचे लवकरच काम सुरू होणारअसल्याचे सांगितले जाते, परंतू अद्याप पर्यंत रस्त्याचे अथवा पुलाचे काम धोकादायकस्थितीत आहे. वास्तविकता रस्त्यांच्या समस्यांमुळेच शाळकरी मुलींचा अपघात झाला आहे, असे म्हणणे सरपंच जयराम तावरे, पोलिस पाटील सुरेश काटे यांनी दिली.
