कागल (प्रतिनिधी) : समरजित घाटगे प्रत्येक गोष्टीसाठी शाहू ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरीत आहेत. त्यांची डिजिटल बोर्ड ही योजना कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या वर्गणीतूनच उभारली जात आहे,असा आरोप गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर केला आहे. कागल येथे आयोजित पत्रकार परिषदेत युवराज पाटील यांनी हा आरोप केला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, नेतृत्व हे विधायक कामातून निर्माण होत असते. समरजित घाटगे मात्र मोठमोठाली डिजिटल बोर्ड उभे करुन नेतृत्व सिद्ध करायच्या नादाला लागले आहेत. हे बोर्ड त्यांनी स्वतःच्या खर्चातून करायलाही काही हरकत नाही. यांच्या डिजिटल बोर्डाचा खर्च ते काबाडकष्ट रक्त आटवून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर का टाकताहेत तेच समजत नाही.
पुढे बोलताना पाटील म्हणाले,आमदार हसनस मुश्रीफ यांनी जलजीवन योजनेच्या माध्यमातून ३०० कोटीहून अधिक निधी कागल विधानसभा मतदार संघासाठी खेचून आणला आहे.तसेच शेतकऱ्यांच्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन लाभ अनुदानासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा जग जाहीर आहे, असे असताना अशा न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी समरजित घाटगे कर्मचाऱ्यांच्या वर्गणीमधून मोठ मोठे बोर्ड उभे करीत आहेत.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, नारायण पाटील, प्रवीण काळबर, दत्ता पाटील, के.पी. पिष्टे, सुनील माने, सुनील माळी, प्रवीण सोनुले आदी प्रमुख उपस्थित होते.
