मुंबई वृत्तसंस्था : केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मुंबई आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत अमित शाह यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उधळला.
जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेखही केला. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली असं शाह म्हणाले. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असंही शाह यांनी भाषणामध्ये म्हटलं.