मुंबई : ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशिव केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण हे तिन्हीही निर्णय रद्द किंवा स्थगित केले असतील तर, हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे’, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली.

संजय राऊत नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर कधी करणार, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून भाजपा विचारत होती. उस्मानाबादचे नामांतर धाराशिवसाठीही त्यांची हीच भुमिका होती. शिवाय, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते. भाजपच आंदोलन करत होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारची पर्वा न करता औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयला फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने स्थगिती दिली असले, तर यांच्यासारखे ढोंगी कोणीही नाही. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.