पवार कुटुंबियांनी २३ साखर कारखाने घशात घातले : राजू शेट्टी यांचा आरोप

जयसिंगपूर : साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार! सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्‍नड साखर कारखाना घशात घालून तो अती कष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबीयांनी २३ साखर कारखाने घशात घातले आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘हुंकार यात्रा व शेतकरी मेळाव्या’त बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते.

पदे आणि कारखाने कायम तुमच्याकडेच!

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. त्याचा अध्यक्ष पदसिद्ध मुख्यमंत्री हेच असत; मात्र शरद पवार एकदा अध्यक्ष झाले आणि कायमचेच अध्यक्ष राहिले. वसंतरावांनी डेक्कन साखर संकुल उभारले आणि त्याचेही तहयात अध्यक्ष शरद पवार बनले. अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी २३ साखर कारखाने घशात घातल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी म्हणालेत की, दिवसा शेतीसाठी वीज मिळावी ही आमची मागणी आहे. यासाठी कोर्टात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, महागाईमुळे शेतकरी भरडला जात आहे. तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे तर, शिल्लक साखरेवर नाबार्ड कडून थेट कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न केलात तर शेतकरी सुखी होईल.

म्हणून ईडी आमच्या मागे लागली नाही

जि. प.च्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक म्हणालेत, भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही आम्हाला फसविले. सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी यांना कोळसा संपलेला समजत नाही. झोपा काढता काय? निवडणुकीत पराभूत झालो, याचे दुःख नाही. सत्तेत असताना आम्ही पैसे मिळवले नाहीत. शेतकर्‍यांचे पाठबळ मिळवले. त्यामुळेच आमच्या मागे ‘ईडी’ लागली नाही.