आगामी काळात उष्माघाताचे रुग्ण वाढणार

राज्यात उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे कि त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 20 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक  म्हणजेच 23 रुग्णांची नोंद  झाली असून, पुण्यात  7 रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

राज्यात 1 मार्च ते 5 मे या कालावधीत उष्माघाताच्या 202 रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक 23 रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. तर बुलडाणा 21, जालना व धुळे प्रत्येकी 20, सोलापूर 18 आणि सिंधुदुर्ग 10 अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही. पण तरीही यावर्षीचा उन्हाळा कडक असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे.

राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना त्याबाबत उपचाराचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान 36.4 ते 37.2 अंश सेल्सिअस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे असेही सांगण्यात आले.